मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते -देवेंद्र फडणवीस
पुणे: मी गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आज जी भूमिका मांडली तीच भाजपची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारमध्ये फेरबदल झाला आहे. नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
यावेळी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.
तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का?
ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, असं ते म्हणाले. इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे 4 महिन्यांचे काम आहे. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, असंही ते म्हणाले.
करून दाखवितो, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणविस यांनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला आमदार चंद्रकांत पाटील माजी आमदार योगेश टिळेकर आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.
सहकार खात्याचा महाराष्ट्राला फायदाच
केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता 70 वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध?, असा दोन्ही काँग्रेसवर हल्ला चढवतानाच या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री अमित शाह राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इंधन दरवाढीवरून सत्ताधारी आघाडीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमधील एखाद्या मंत्र्याला त्याच्या बायकोने मारलं तरी हे म्हणतील त्यात केंद्राचा हात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
एकानेही शिवीगाळ केली नाही
विधानसभेत झालेल्या गोंधळावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. मी गेले २२ वर्ष सभागृहात आहे. कुणाला आवडो न आवडो पण माझंही एक महाराष्ट्रात रेप्युटेशन आहे. त्याआधारे सांगतो, भाजपच्या एकाही नेत्याने सभागृहात शिवीगाळ केलेली नाही. एकाही नाही. कोणीही नाही. बाचाबाची झाली. तीही डिस्टन्सवरून झाली. सेनेचे लोकं आमच्या अंगावर आले. शिवीगाळ करणारे कोण होते याची नीट माहिती घ्या. या लोकांची नावं मी योग्यवेळी सांगेल. पण एवढं सांगतो पीठासीन अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली नाही. हे सर्व कपोलकल्पित आहे. भाजपविरोधात रचलेलं हे कुंभाड आहे, असा दावाही त्यांनी केला.