साहिर लुधियानवी आर्थिक न्यायाचे उद्घोषक – लक्ष्मिकांत देशमुख
पुणे ः साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या काव्यातून, गीतांतून सातत्यान समाजातील वंचित शोषित गरीबांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वांना किमान दोन वेळेचे पोटभर अन्न मिळावे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी सातत्याने काव्यातून गीतांतून आवाज उठविला.त्यांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत भाष्य करावयाचे झाल्यास साहिर लुधीयानवी आर्थिक न्यायाचे उद्घोषक होते असे म्हणटल्यास वावगे होणार नाही असे मत अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
बलराज सहानी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे साहिर लुधियानवी जन्मशताब्दी निमित्त देण्यातयेणा-या पुरस्कारांचे वितरण आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यंदाचा साहिर लुधियानवी पुरस्कार नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि लेखक डाॅ. आशुतोष राराविकर यांना प्रदान करण्यात आला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमाबी शेख पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या स्वालेहा एजाज हक यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थापन झालेल्या स्मशान फंड कमिटीत सक्रिय असलेले कमांड हाॅस्पिटलचे आरोग्य सेवा कामगार ज्ञानेश्र्वर माने व सुलोचना डांगे यांचा कोरोना योद्धे म्हणुन सत्कार करण्यात आला.
यावेळी बलराज सहानी- साहिर लुधियानवी फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, शिवानी टिळेकर, पुरस्कार्थी डाॅ. आशुतोष राराविकर,स्वालेहा एजाज हक, स्मशान फंड कमिटीशी संबंधित सोमेश्र्वर गणाचार्य उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, साहिर लुधियानवी हे कृतीशिल शायर होते. त्यांनी वेळोवेळी जाहीर भूमिका घेतल्या होत्या. ते त्यांच्या शेवटच्या काळात व्हिल चेअरवर होते परंतू त्याही परिस्थितीत ते गरिबांच्या, स्त्रियांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले. कला जीवनासाठी या परंपरेला मानना-यां शायरांच्या यादीत साहिर लुधियानवी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.कला जीवनासाठी हे त्यांनी त्यांचे शस्त्र बनवले. साहिर लुधियानवी हे आर्थिक न्यायाचे समर्थक होते.ते समाजवादी होते. ते मातृभक्त होते. स्त्रीयांवर होणा-या अन्याया प्रति त्यांच्या मनात प्रचंड चिड होती. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाली पाहिजे ह्या विचारांवर त्यांचा भर होता. ऐसा मिले समाज सबको मिले अनाज ही त्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान होते.साहिर लुधियानवी यांना सभोवतालचा निराशावाद दिसत होता परंतू ते प्रचंड आशावादी होती हे त्यांच्या वो सुभह कभी तो आयेंगी या त्यांच्या गीतावरुन स्पष्ट होते.