वंचित घटकांना न्याय देण्यासाठी “बार्टी “काम करेल -महासंचालक धम्मज्योती गजभिये
पुणे :– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार जोमाने होत आहे. त्यांचे विचार आपण आचरणात आणावे त्यांनी या देशाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा बार्टी पुढे नेत आहे असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था “बार्टी” येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते होते, असा अपप्रचार करण्यात आला. परंतु डॉ.आंबेडकरांनी या देशातील सर्व समाज घटकांसाठी काम केले. त्यांनी नेहमीच प्रथम देशाला प्राधान्य दिले . सर्व विश्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती मान्य केली.त्यामुळेच संपूर्ण जगात त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. कोलंबिया विश्वविद्यापीठाने त्यांना “ज्ञानाचे प्रतीक” म्हणून गौरव केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मानवतेच्या कल्याणाचा विचार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार जोमाने होत आहे. त्यांचे विचार आपण आचरणात आणावे त्यांनी या देशाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा बार्टी पुढे नेत आहे असे प्रतिपादन महासंचालक गजभिये यांनी केले . “बार्टी” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत आहे. शिक्षण ,शेती ,पाणी, याविषयावर बार्टीच्या माध्यमातून संशोधन करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांत बंद असलेले विचार “बार्टी” पुढे नेईल. दलित शोषित पीडित उपेक्षित वंचित नव्हे तर सर्वांना न्याय देण्यासाठी बार्टी काम करत आहे. याच कार्यक्रमात ” आजची परिस्थिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार”. या विषयी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आम्ही पण माणसेच आहोत हे त्यांना सांगायचे होते . त्यांच्यामुळेच देशाला राज्यघटना मिळाली .आपण सामाजिक न्यायाचे हक्कदार झालो.या देशात 80 टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. 40टक्के लोक हे अल्प भुधारक आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला होता. खोती आंदोलन, शेतीचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाकडे न्यावे लागेल .शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे म्हणून त्यांनी संकल्पना मांडली होती . औद्योगिकरणाची गती वाढवावी लागेल. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. डॉ. आंबेडकरांनी खेडी सोडून शहराकडे जावे,असा मोलाचा संदेश दिला. डॉ .बाबासाहेब आंबेडकर जलसाक्षरतेचे जनक होते .या देशातील नद्याजोड प्रकल्प अंमलात आला पाहिजे .धरणे बांधली पाहिजेत, पाणी लवाद, जलवाहतूक ,ही संकल्पना त्यांनीच मांडली होती. शिक्षण नसेल तर माणूस गुलाम बनतो. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण दिलेच पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. वंचित घटकातील मुलांना “बार्टी” उच्च शिक्षण देत आहे. हे गौरवास्पद असल्याचे उदगार त्यांनी यावेळी काढले. डॉ. आंबेडकरांच्या कार्यासह विविध पैलूवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमा पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये , निबंधक उमेश घुले व इतर मान्यवर उपस्थित होते.