पं. भीमसेन जोशी हा आपला अजरामर वारसा – नितीन गडकरी
पुणे, दि. १३ – ‘पं. भीमसेन जोशी यांचे गायन अजरामर आहे. शास्त्रीय गायन, अभंग अशा अनेक माध्यमातून त्यांनी संगीत सेवा केली.या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जपून त्यांना आपण अभिवादन केले, ही चांगली गोष्ट आहे. हा ‘खयाल यज्ञ ‘महोत्सव रसिकांच्या हुदयात कोरला जाईल. पं. भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे. महोत्सवात सहभागी कलाकारांचे मी अभिनंदन करतो ‘, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनीवारी सकाळी केले.
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनीवारी दिग्गज कलाकारांनी सुरेल गायन सेवा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी साडेनऊ वाजता सदिच्छा भेट दिली. भाषणातून शुभेच्छा दिल्या, आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला. पुनीत बालन यांनी नितीन गडकरी यांचा सत्कार केला.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘ भारतीय
शास्त्रीय संगीतात फार मोठी शक्ती आहे. ते सर्वांना आवडते, पण त्याचे सादरीकरण, प्रेझेंटेशन आपण चांगल्या रितीने केले पाहिजे.संगीताच्या चांगल्या आराधनेला रसिकांचा प्रतिसाद मिळतो, पण, सरकार, पालिकांनी सभागृहे उपलब्ध करून दिली पाहिजे.
यावेळी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. विजय घाटे,सौ. कांचन गडकरी, सौ. गिरीजा बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पुनीत बालन,आ. सिध्दार्थ शिरोळे, मेधा कुलकर्णी, गणेश बीडकर, श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, गोविंद बेडेकर,मंजुषा पाटील, चितळे
उपस्थित होते.डॉ.विनिता आपटे, राहुल सोलापुरकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित हा महोत्सव
१२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू आहे.
पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
१३ फेब्रुवारी रोजी अश्विनी भिडे -देशपांडे,पंडित डॉ राम देशपांडे,पं जयतीर्थ मेवुंडी,सावनी शेंडे-साठे,संदीप रानडे,सौरभ नाईक,ओंकार दादरकर,पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा,पद्मा तळवलकर इत्यादी मान्यवर गायकांनी सुरेल सादरीकरण केले.
१४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर,कलापिनी कोमकली,राहुल देशपांडे,निषाद बाक्रे ,देवकी पंडित,विनय रामदासन,गौतम काळे,रघुनंदन पणशीकर ,मंजुषा पाटील ,पंडित राजन मिश्रा ,पंडित साजन मिश्र इत्यादी मान्यवर गायनसेवा रुजू करणार आहेत.