मनपा आणि खाजगी विद्यालये यात गुणवत्ता, व्यवस्थापन व स्वच्छताची समानता – वर्षा गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मनपा शाळेला भेट
पुणे, दि. २७ – प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य सरकारने अखेर इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याला परवानगी दिली. आज पुण्यातील विविध शाळांची पाहाणी केली असता व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मनपा विद्यालये आणि खाजगी विद्यालये यात गुणवत्ता, व्यवस्थापन व स्वच्छताची समानता पहायला मिळाली असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन खाजगी व महानगरपालिकेच्या शाळातून कशा पद्धतीने केली जात आहे याची पाहणी करण्यासाठी पुण्यातील हुतात्मा बालवीर शिरिषकुमार माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर शाळेला भेट दिली त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयुक्त राजेंद्र जगताप, उपायुक्त नितीन उधास, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, शिक्षणाधिकारी सुनंदा वखारे, शिक्षणाधिकारी शिवाजी दौंडकर, नगरसेविका जोशना ताई एकबोटे, शाळा प्रमुख संध्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांनी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याच बरोबर आरोग्य व्यवस्था, स्वच्छता याची पाहणी केली. शिक्षणमंत्र्यांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी आम्हाला ऑनलाइन शिक्षण नको, आम्हाला ऑफलाईन शिक्षण हवं अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.