fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दाखवला ‘ठाकरी’बाणा

मुंबई, दि. 13 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांवरुन खरमरीत पत्र लिंहिलं होतं. याला मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहित उत्तर दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही अशा शब्दात उत्तर देत आपला ठाकरी बाणा दाखवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘धर्मनिरपेक्षता’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

तत्पूर्वी राज्यपालांनी आपल्या पत्रात लिहिले होते की, प्रिय उद्धव ठाकरे, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशीसंवाद साधताना मिशन बिगिन अंतर्गत पुनश्च: हरि ओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यामंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत. ११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिरांचे लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडं तुम्ही बार, रेस्टॉरन्ट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळेस दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले.

गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचा समावेश होता. तुम्ही कट्टर ‘हिंदुत्ववादी’ आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभ श्रीरामांचे दर्शनही घेतले होते. तसेच आषाढी एकादशमीच्या दिवशी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती.

मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो सेक्युलर शब्द तुम्ही स्वीकारला आहे? मी येथे नमूद करु इच्छितो की, दिल्लीत ८ जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करम्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरे सुरु करण्यात आली होती. मंदिरे सुरु झाल्यानंतर तेथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेले नाही. मी विनंती करतो की, कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मला प्राप्त झालेली तीन प्रेजेंटेशनही जोडत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading