आताच्या परिस्थितीत सामाजिक आरोग्य जपणे हा राष्ट्रधर्म – प्रा.मिलिंद जोशी
पुणे, दि. २ – लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सुत्री देशवासियांना दिली होती. मात्र, आजच्या काळात जर टिळक असते, तर त्यांनी ५ वी आरोग्यसुत्री समाजाला दिली असती. सामाजिक आरोग्य जपून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश त्यांनी दिला असता. त्यामुळे आताच्या परिस्थितीत सामाजिक आरोग्य जपणे हा राष्ट्रधर्म आहे, असे सांगत प्रख्यात वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टसह पुण्यातील सुमारे २१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिन्टन्सिंगचे नियम पाळून केसरी वाडयातील लोकमान्य टिळकांच्या संग्रहालयाला लोकमान्यांच्या १०० व्या पुण्यथितीनिमित्त भेट दिली. यावेळी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन देखील करण्यात आले. पियुष शाह, शिरीष मोहिते, सुनील मारणे, किरण सोनिवाल, हनुमंत शिंदे, अमोल सारंगकर, प्रितम शिंदे, कुणाल पवार, वैभव रोकडे, प्रमोद राऊत, अमर जाधव, किरण शेट्टी, हर्षद नवले आदी यावेळी उपस्थित होते. संग्रहालयातील टिळकांची पत्रे, छायाचित्रे व इतर माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी टिळकांचा जीवनप्रवास जाणून घेतला.