अरविंद बनसोड, विराज जगताप हत्या प्रकरणात आम आदमी पार्टीची फ़ास्ट ट्रॅक कोर्टा ची मागणी!
पुणे, दि. 10 – नागपुरातील अरविंद बनसोड हत्येविषयी बातम्या येत असतानाच रविवारी रात्री पिंपळे गुरव येथील विराज जगताप याची हत्या झाली आहे . या प्रकरणात हत्या झालेल्या दलित मुलाचे सवर्ण मुलीवर प्रेम असल्याने ही हत्या झाल्याचे समोर येते आहे.
काही दिवसांपूर्वी नागपुर जिल्ह्यातील नरखेड़ तालुक्या मधील पिम्पळधरा गावात अरविंद बनसोड या दलित विद्यार्थ्याचा निर्घृण मृत्यू झाला असून पोलिसांनी या संदर्भात आत्महत्या केल्याचा FIR दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घ्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्रचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी या विषयीचे प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून विराज ची आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप होत आहे. नरखेड़ हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधानसभा क्षेत्र आहे.
काही महिन्यांपूर्वी डॉ पायल तडवी या विद्यार्थिनीने मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या आरोपा च्या प्रकरणाची चौकशी अजूनही पूर्ण झालेली नसून सत्य जनतेसमोर यायला विलंब होत आहे.
गेल्या काही वर्षात जातीय द्वेषाचे लोण मोठ्या प्रमाणात शहरी भागातही पसरत असल्याचे दिसते आहे. यात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आशीर्वादामुळे गुंड प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे याच बरोबर कोर्टामधील विलंब आणि कायद्याचा कमी झालेला वचक हाही कारणीभूत आहे. धर्मांध प्रवृत्तीचे राजकारण सर्व समाजात ‘धार्मिक द्वेष’ आणि ‘जाततणाव’ सुद्धा वाढवते, ही वस्तुस्थिती या घटनामधून अधोरेखित होते आहे .
या पार्श्वभूमीवर तसेच याबाबत केस उभी राहताना पुराव्यामध्ये कुठेही त्रुटी राहू नयेत हे पाहणे गरजेचे आहे. विराज जगताप आणि अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाचा वेगाने तपास करून दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे, दलित जातीय अत्याचार कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे करण्यात आली आहे.