fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRANATIONAL

राज ठाकरे यांचा योगी आदित्यनाथ यांना इशारा

महाराष्ट्रात यायचे असेल तर आमची परवानगी घ्या

मुंबई – उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारच राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. “कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती योगी यांनी दिली. योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज यांचे उत्तर

योगी यांनी नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिल्यानंतर यावरुनच राज यांनी योगी यांना इशारा दिला आहे. एका फेसबुक पोस्टमधून यासंदर्भात आपले मत मांडताना, “उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं,” असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारला सल्ला

योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. “महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading