लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात रेड झोन मध्ये सवलत नाही
मुंबई – देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने परत एकदा राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 18 मे ते 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्यात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. राज्यात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. राज्यात रुग्णसंख्येनुसार चार झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे रेड आणि कटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कडक होतील अशी शक्यता आहे, तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंद शिथिल करून उद्योगांना चालना दिली जाईल अशी शक्यता आहे.
रेड झोन (हॉटस्पॉट क्षेत्र) सवलत नाही
कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या भागात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच, कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल. त्या भागाच्या सुरक्षा क्षेत्रात व्यस्त असलेले कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्यांना फक्त परवानगी राहिल.
तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत.
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्यांना सवलत मिळू शकते. नियमितपणे या भागांचा आढावा घेवून काही भागात थोडी सवलत दिली जाईल. सवलत देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, जेणेकरून कार्यालय, कार्यस्थळ, कारखाने किंवा संस्थांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जाईल.
राज्यात काय काय राहू शकत सुरु ?
1. दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं, साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
2. प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
3. अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
4. सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. कार्यालयीन ठिकाणी हात धुण्याची सुविधा आणि हँड सॅनिटायझर आवश्यक आहे.
5. औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स, डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
6. बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
7. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
8. आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
9. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
10. शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था
राज्यात काय राहणार बंद?
1. खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.
2. तसंच खासगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे, पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि दोन व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
3. सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
4. होम क्वारंटाइन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील. त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यक्तींना सरकारी क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात येईल.
5. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी कायम आहे.
6. अत्यावश्यक सेवा वगळल्यास सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील.
7. सगळी प्रार्थनास्थळं सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. पुजाऱ्यांना आतमध्ये पूजा करण्याची किंवा धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल.